जळगाव- आज २ वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृतांमध्ये जळगाव शहरातील एका वृद्ध व्यक्तीसह जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे, तसेच तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही आत्महत्यांमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
जळगाव शहरातील जानकी नगरात जिजाबराव नागो वाणी (वय ६२) हे कुटुंबासह राहतात. आज सकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी दरवाजाच्या चौकटीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी तात्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी वाणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
दुसरी घटना जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे घडली. नांद्रा येथील रहिवासी नजमा बी सलीम न्हावकर (वय ५३) या महिलेने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना आज सकाळी ७ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नजमा यांनी आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना अंदाज आहे.
हेही वाचा- जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न