जळगाव - कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात 15 मे पर्यंत सशर्त लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु, रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया हे सण लागोपाठ येत आहेत. या सणांच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने एक तास अतिरिक्त उघडी ठेवण्यास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी परवानगी दिली.
हेही वाचा - जळगाव : पात्र गाळेधारकांचेच नुतनीकरण, अन्यथा लिलाव; महासभेने दिली मंजुरी
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी जिल्हाधिकारी राऊत यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे, रमजान ईद आणि अक्षय्य तृतीया या सणांच्या खरेदीसाठी नागरिकांना काहीअंशी दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येत होती. ती आता एक तास पुढे सुरू राहतील. म्हणजेच सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंतची मुभा आहे. परंतु, ही परवानगी केवळ दोन दिवसांसाठी असणार आहे. खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळून कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.
काय आहे नेमका आदेश?
12 मे 2021 ते दिनांक 14 मे 2021 या कालावधीत रमजान ईद (ईद-उल-फितर) व अक्षयतृतीया या सणानिमित्त खालील प्रमाणे आदेश पारीत केले आहेत.
1) दिनांक 12 मे 2021 ते दिनांक 14 मे 2021 या कालावधीत सकाळी ७ ते सकाळी १२ वाजेपर्यंत किराणा दुकाने, ड्रायफ्रुट दुकाने, भाजीपाला, फळविक्री, अंडी / चिकन / मटन / मास विक्रीची दुकाने, बेकरी, दूध विक्री केंद्रे सुरू राहतील.
2) सदर सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांनी आपल्या प्रभागातील दुकानातून खरेदी करावी. शक्यतो होम डिलिव्हरीस प्राधान्य देण्यात यावे व खरेदीसाठी जाताना नागरिकांना शक्यतो वाहनाचा वापर टाळावा.
3) दुकान मालकांनी दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये. तसेच, दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरीता दुकानासमोर वर्तुळ तयार करून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सुचित करावे.
4) खरेदीसाठी दिलेल्या सुटमध्ये दुकानदार व नागरिक यांनी कोविड-19 नियमावलीचे पालन करावे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, नागरिक यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी.
5) वरील बाबीं व्यतिरिक्त दिनांक 22 एप्रिल, 2021 व दिनांक 30 एप्रिल 2021 अन्वये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील.
हेही वाचा - बार-हॉटेल मालकांप्रमाणे शेतकरी, कष्टकऱ्यांचीही दखल घ्या; रक्षा खडसेंचे शरद पवारांना पत्र