जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. या केंद्रामुळे बहिणाबाईंच्या साहित्याचा सर्वांगाने अभ्यास करणे शक्य होणार आहे.
गेल्यावर्षी ११ ऑगस्ट २०१८ रोजी विद्यापीठाचे 'कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार झाले होता. त्यानंतर ८ ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विद्यापीठात नामविस्तार सोहळा साजरा झाला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाच्या मागण्यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावेत. विद्यापीठाच्या पाठीशी सरकार उभे राहील, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर विद्यापीठाने विकासाचे काही प्रस्ताव सरकारकडे सादर केले होते. डिसेंबर महिन्यात कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेवून विद्यापीठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा केली होती.
काय असेल या केंद्रामध्ये -
बहिणाबाईंच्या जीवनाविषयी व त्यांच्या कवितांविषयी माहिती देणारे केंद्र म्हणून कार्य करणे. बहिणाबाईंची माहिती देणारे दृकश्राव्य दालन उभारणे, कवितांवरील लेखांचे संकलन करणे. लेवाबोली- समाज संस्कृती यांच्या अभ्यासास प्रोत्साहन देणे. संबंधित विषयांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करणे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक उपक्रम आयोजित करणे. अशी काही उद्दीष्टे हे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाने निर्धारित केली आहेत. विद्यापीठाने या केंद्रासाठी नवीन पदनिर्मिती व त्यासाठी वित्तीय तरतूद मिळण्याची विनंतीही या प्रस्तावात केली आहे.