जळगाव- महाविकास आघाडी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी ५ दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २९ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या निर्णयानंतर सोमवारी पहिल्यांदाच सरकारी कर्मचारी कामावर आले. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 'कही खुशी, कही गम' असे वातावरण जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांमध्ये पाहायला मिळाले.
सरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा असावा, ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपल्या महत्त्वाकांशी निर्णयांमध्ये सरकारने त्याचा समावेश केला. २९ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु, त्या दिवशी नेमका शनिवार असल्याने सरकारी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या सरकारच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया जाणून घेता आल्या नाहीत. हा निर्णय लागू झाल्यानंतर सोमवारी पहिल्यांदाच त्याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेता आल्या. 'ई-टीव्ही भारत'ने जळगावातील अनेक सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.
मुखत्त्वे करून पुरुष कर्मचारी सरकारच्या निर्णयाबद्दल खुश आहेत. तर, महिला कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अडचणी वाढवणारा वाटत आहे. ५ दिवसांचा आठवडा झाल्याने आता दैनंदिन कामकाजाचा ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामाचा उत्साह असेल. शिवाय, हा निर्णय घेताना सरकारने कामाचे तास वाढवले असल्याने त्याचा कामावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. आठवड्यातून २ दिवस सुटी असल्याने कुटुंबीयांसोबत वेळ घालवता येईल. त्यामुळे, सरकारचा निर्णय हा कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने चांगला आहे, अशा भावना काही कर्मचाऱ्यांनी मांडल्या.
दरम्यान, सरकारच्या निर्णयाबद्दल महिला कर्मचाऱ्यांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण आहे. महिलांना घरची जबाबदारी सांभाळून नोकरी करावी लागते. सरकारने ५ दिवसांचा आठवडा करण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला तरी कामाचे तास वाढवायला नको होते. या निर्णयामुळे सकाळी लवकर कामावर यावे लागेल. शिवाय, सायंकाळी उशिरा कामावरून घरी जावे लागणार आहे. त्यामुळे, महिलांच्या अडचणी वाढतील, असे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा- परीक्षा दहावीची : 'तर... केंद्र संचालकासह पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल होणार'