जळगाव - जिल्हा कारागृहातून पळून गेलेल्या तिघांपैकी एका कैद्याला पकडण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. सागर संजय पाटील (वय 24, रा. पैलाड, अमळनेर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथून त्याच्या मुसक्या आवळल्या.
जळगाव जिल्हा कारागृहातून 25 जुलैला सकाळी साडेसातच्या सुमारास कैदी सुशील मगरे(वय 32, रा. कसबे पहूर, ता. जामनेर), गौरव विजय पाटील आणि सागर संजय पाटील (दोघे रा. अमळनेर) हे तिघे पळून गेले होते. कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ड्युटीवर असलेले रक्षक पंडित दामू गुंडाळे यांना मारहाण करत त्यांच्या डोक्याला पिस्तूल लावून तिघा कैद्यांनी फिल्मी स्टाईल पलायन केले होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तिघांना पळून जाण्यासाठी त्यांचा साथीदार जगदीश पुंडलिक पाटील(वय 19, रा. पिंपळकोठा, ता. एरंडोल) याने मदत केली होती. जगदीशने अन्य एका मित्राच्या मदतीने तिघांना कारागृहात पिस्तूल, काडतूस पुरवले होते.
कारागृहातून बाहेर आल्यानंतर तिघांना जगदीशने चोरीच्या दुचाकीवरून पळवून नेले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची 5 पथके आरोपींचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी जगदीश हा खासगी लक्झरी बसने सुरतला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना एलसीबीच्या पथकाने त्याला अटक केली होती. त्यानंतर आता फरार असलेला सागर पाटील यालाही अटक झाली आहे.
कारागृहातून पळून गेल्यानंतर सागर याने त्याचा साथीदार गौरवच्यासोबत अमळनेरात पिस्तुलचा धाक दाखवून एका तरुणाची दुचाकी चोरून नेली होती. त्यानंतर सागर हा नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये लपला असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकातील हेडकॉन्स्टेबल रवींद्र पाटील, कमलाकर बागुल, पोलीस नाईक रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान, सागरचे साथीदार सुशील मगरे आणि गौरव पाटील हे अद्यापही फरार आहेत. सुशील मगरे हा पोलीस दलातून बडतर्फ झालेला असून, पुण्यात घडलेल्या एका दरोड्यात तो आरोपी आहे.