जळगाव - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. यामुळे रेल्वेसह बस अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सर्व खासगी प्रवासी वाहनांच्या प्रवेशावर बंदी आहे. त्यामुळे गावाकडे परतायचे कसे? या विवंचनेत सुरतहून थेट पायी विदर्भात जाणार्या नागरिकांसाठी पोलिसांनी निवासाची व्यवस्था केली आहे. जळगावमार्गे प्रवास करत असलेल्या यवतमाळच्या 14 जणांसाठी पोलिसांनी जेवणाची देखील सोय केलीय.
पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना सुरतवरून काही नागरिक पायी विदर्भात जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरसाठ यांनी चौकशीसाठी पथक रवाना केले. या पथकाने अजिंठा चौफली गाठून पायी जात असलेले रणजीत परशुराम राठोड, नीलेश विसावर राठोड, निखिल प्रकाश चव्हाण, किशोर रामदास जाधव, नीलेश जंगू पवार, राजू सुरेश राठोड, राहुल बबन मंडळ, साईदुल बारा गुलाम बारा, पोभीसेन सुनील सेन, अविनाश पुंडलिक चव्हाण, प्रवीण पुंडलिक पवार, सचिन शांताराम पवार, उमेश प्रेम राठोड, रबी मोहन राठोड (सर्व राहणार-दारव्हा, जि.यवतमाळ) या सर्वांची विचारपूस केली. यानंतर सर्वांना जेवणासह निवार्याची आवश्यकता असल्याने पोलिसांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. सर्वांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यानंतर सर्वांची काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जेवणाची देखील व्यवस्था केली. घुगे पाटील ट्रान्सपोर्टचे गजेंद्र पाटील यांनी संबंधितांना वाहन उपलब्ध करून दिले. एमआयडीसी पोलिसांनी या प्रवाशांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. तपासणीनंतर सर्वांची राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सहकार्याबद्दल यवतमाळच्या नागरिकांनी पोलिसांसह सामाजिक संघटना तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.