जळगाव - जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील एका महिलेने पुनर्विवाह केला म्हणून जात पंचायतीच्या पंचांनी तिला अमानुष शिक्षा केली होती. तसेच, तिच्या कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले होते. या प्रकरणाला अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी वाचा फोडली होती. अखेर या प्रकरणात पीडित महिलेच्या भाच्याने दिलेल्या तक्रारीवरून आज चोपडा शहर पोलीस ठाण्यात जात पंचायतीच्या पंचांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - जळगावमधील सरकारी वकील रेखा राजपूत खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
काय आहे प्रकरण?
चहार्डी येथील माहेर असलेल्या पीडित महिलेचा 2011 साली पहिला विवाह झाला होता. मात्र, पती दारू पिऊन सतत मारहाण करत असल्याने 2015 मध्ये तिने न्यायालयात रितसर घटस्फोट घेतला. पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या समाजाच्या जात पंचायतीच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट धुडकावून लावला. दरम्यान, पीडित महिलेने 2019 मध्ये एका घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाह जात पंचायतीच्या पंचांनी अमान्य करत पीडितेला 1 लाख रुपयांचा दंड केला. पंचांनी एकत्र येऊन न्यायनिवाडा करण्याच्या नावाखाली पीडितेच्या कुटुंबाला जातीतून बहिष्कृत केले. त्यांना धार्मिक, सामाजिक कार्यात सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. त्यांना मदत करणाऱ्या इतर चार परिवारासही बहिष्कृत करण्यात आले होते.
पीडितेला केली अत्यंत अमानुष शिक्षा
पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबत रहावे, असा हेका पंचांनी कायम ठेवला. तसेच, पुन्हा जातीत येण्यासाठी एक अमानुष शिक्षा दिली. ती म्हणजे, पंचांनी केळीच्या पानावर थुंकायचे व त्या महिलेने ते चाटायचे. विशेष म्हणजे, कोरोना काळात ही शिक्षा दिली गेली. पंचांच्या पायातील जोडे पीडित महिलेने डोक्यावर घेऊन पंचांच्या पायावर नाक घासायचे. नंतर पीडित महिलेचे तोंड काळे करण्याची शिक्षा देण्यात येईल, असे पंचांनी जाहीर केले. पीडित महिला पंचांच्या दबावामुळे सध्या माहेरी राहत आहे. तिच्या दुसऱ्या नवऱ्यालाही जात पंचायतीने धमकी दिली आहे. न्यायालयाचा निकाल मानायचा असेल तर पीडित कुटुंबाने धर्म बदलावा, असा हुकूम पंचांनी काढला होता.
'अंनिस'ने केला पाठपुरावा
दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती पीडित महिलेच्या मदतीला धावून गेली. समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, दिगंबर कट्यारे, डाॅ. अय्युब पिंजारी व जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे यांनी या प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर अकोला जिल्ह्यातील नाथजोगी समाजाच्या जातपंचायतीच्या पंचांविरुद्ध, चोपडा शहर पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा गुन्हा अकोला पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिली.
हेही वाचा - मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अट्टल चोरटा अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई