हिंगोली - शहरात तब्बल 15 वर्षांपासून बसविलेला दिशादर्शक फलक वाहतूक शाखेकडून हटविण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फलक डावीकडे असलेला रस्ता दाखविण्याऐवजी रस्ताच नसलेल्या उजव्या बाजूकडे दिशा दाखवत होता. इतके वर्ष होऊनही हा फलक कोणाच्या लक्षात का आला नसेल, याबद्दल आता चांगलीच चर्चा रंगत आहे.
शहरापासून जवळच असलेल्या अकोला-नांदेड महामार्गावरील अकोला बायपास नावाने एक चौक प्रसिद्ध आहे. या चौकातून नेहमीच वाहनांची नेहमीच वर्दळ असते. विशेष म्हणजे याच महामार्गावर उत्तर भारतातून दक्षिण भारतात अवजड वाहनांची ये-जा सुरू राहते. या चौकात वाहनांना दिशा दाखविण्यासाठी बसविण्यात आलेला दिशा दर्शक फलक चुकीच्या दिशा दर्शवत होता. अकोला बायपास येथे नेहमीच अपघाताच्या घटना घडत असल्याने त्या ठिकाणी गतीरोधक बसविण्यासाठी आज वाहतूक शाखेचे सपोनि ओंमकांत चिंचोळकर हे घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या हा प्रकार लक्षात आला.
हेही वाचा - पुणा नाईट हायस्कूलचा अभिनव उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांसाठी 'सायकल बँक'
दरवर्षी या फलकाची रंगरंगोटी केली जाते. तसेच या रस्त्यावर अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांची देखील ये-जा सुरु असते. चुकीचा फलक दिसताच सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी तत्काळ कर्मचारी पाठवला. तसेच तो फलक काढून घेतला. मात्र, गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून चुकीच्या दिशादर्शक फलकामुळे कित्येक वाहन चालकांना त्रास झाला असेल? तसेच किती अपघाताच्या घटना घडल्या असाव्यात आणि याला जबाबदार कोण, हा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच अकोला ते नांदेड महामार्गावर अनेक ठिकाणचे दिशादर्शक फलक हे गायब झाले आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या विळख्यात सापडलेले आहेत, त्याकडेही सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.