हिंगोली - प्रसूती झाल्यानंतर पाच तासातचं महिलेचा मृत्यू झाल्याची घटना वसमत येथे घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
गंगासागर दुर्गादास कांबळे (वय 22) असे या मृत महिलेचे नाव आहे. 8 जून रोजी या महिलेला प्रसूतीसाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथे या महिलेची सिजेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली. या महिलेने एका मुलाल जन्म दिला. प्रसूतीच्या साडे पाच तासानंतर अचानक तिच्या पोटामध्ये वेदना होत असल्याचे महिलेने सांगितले. त्यामुळे डॉक्टरांनी तिली एक इंजेक्शन दिले. त्यानंतर काही क्षणातच या महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेने महिलेचे नातेवाईक गोंधळून गेले. महिलेचा रात्री बारा वाजता मृत्यू झाला होता मात्र, मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाच्यावतीने विलंब केला जात होता. महिलेला ताप आल्याचे कारण डॉक्टराने देत स्वॅब घेण्यासाठी मृतदेह ठेवल्याचे डॉक्टरांच्यावतीने सांगितले गेले. मृतदेह ताब्यात दिला जात नसल्याने नातेवाईकांनी आक्रोश करत रुग्णालयाचा परिसर दणाणून सोडला.
गरोदर मातांच्या शस्त्रक्रिया करण्यावर सर्वाधिक भर -
वसमत येथील शासकीय स्त्री रुग्णालयात कार्यरत असलेल्या शासकीय डॉक्टरांचे स्वतःचे रुग्णालय आहे. ते शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्याऐवजी काहीतरी कारण सांगून आपल्या रुग्णालयांमध्ये रुग्णांना हलवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक शस्त्रक्रियेमागे डॉक्टरांना शासकीय रक्कम मिळत असल्याने, ते जास्त शस्त्रक्रिया करण्यावरच भर देत असल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी नातेवाईक शहर पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. मात्र, या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शस्त्रक्रियेनंतर महिलेला वाटू लागले अस्वस्थ -
प्रसूती शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर योग्य ते उपचार केले. मात्र, तिला ताप येऊन कोरोना सारखी लक्षणे जाणवू लागले. यामुळेच कदाचित तिचा मृत्यू झाला असावा. महिलेचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठवला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यशवंत चव्हाण यांनी सांगितले.