हिंगोली - जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट नवे नाही. दरवर्षी प्रमाणे हिंगोली जिल्हा तीव्र पाणीटंचाईमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चालू वर्षी जिल्ह्यातील सर्वच तलाव कोरडे ठाक पडल्यात जमा आहेत. त्यातच जागतिक जलदिनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात माती मुरवण्यासाठी पाण्याचा अपव्यय होतोय, तर दुसरीकडे मात्र, पाणी वाचविण्यासाठी जलदिंडी रॅली काढली जातेय, असे विरोधाभासी चित्र दिसून येते आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानाची स्थिती आहे. यावर्षी ७५ मी.मी. एवढा पाऊस जिल्ह्यात झाला असून, आजघडीला विहिरी, हातपंप, तलाव कोरडे पडलेले आहेत. आजही जिल्ह्यातील पाचही पंचायत समित्यात ३० ते ४० पेक्षा अधिक गावांनी टँकरसाठी अधिग्रहन प्रस्ताव पाठवले आहेत. यापैकी काही गावांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. एवढी भीषण पाणीटंचाई असताना देखील हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र चक्क पाणी माती मुरवण्यासाठी वापरण्यात येत असल्याची खळबळजनक बाब जागतिक जलदिनी उघड झाली आहे.सध्या हिंगोली जिल्ह्यात पाण्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. मात्र, असे असताना प्रशासकीय व्यवस्थेकडूनच पाण्याचा अपव्यय केला जातोय. पाणी वाचविण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून जल दिंडी देखील काढली जात आहे. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत खरोखरच प्रशासन गंभीर आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.