हिंगोली - रायगड जिल्ह्यातील दापोली येथे लग्नाची मागणी धुडकावून लावल्याच्या कारणावरून गळा चिरून माय-लेकींची हत्या करणाऱ्या खुन्याने हिंगोलीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून धूम ठोकून आपल्या पहेनी या गाव शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृताविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
प्रकाश यशवंता मोरे (रा. पहेनी जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे. प्रकाश हा अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील दापोली येथे भाड्याची खोली घेऊन वास्तव्यास होता. पत्नीचा बाळंतपणात मृत्यू झाल्याने तो त्याच्याच चाळीत राहत असलेल्या कळमनुरी तालुक्यातील रुपुर येथील सिद्धार्थ बलखंडे यांच्या सुजाता नावाच्या मुलीला लग्नासाठी मागणी घालत होता. मात्र, मुलीचे शिक्षण सुरू असल्याने तिच्या आई-वडिलांनी लग्नाला स्पष्ट विरोध दर्शविला. तरीही प्रकाश काही केल्या ऐकत नव्हता. त्याच्या अधून-मधून धमक्या सुरूच होत्या. त्यामुळे सुजताच्या आईने पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून प्रकाशविरुद्ध तक्रार दाखल केली होती. यात 107 कलमानुसार गुन्हा ही दाखल झाला होता.
कंटाळून आले होते गावी कुटुंब
प्रकाश या लग्नासाठी एवढा मागे लागला होता की, त्याने बलखंडे कुटुंबाला सळो की पळो करून सोडले होते. तो नेहमीच सुजाताच्या घरी जाऊन तिला लग्नासाठी मागणी घालत असे. त्यामुळे बलखंडे कुटुंब प्रकाशच्या त्रासास कंटाळून आपल्या मूळ गावी रुपुर येथे आले होते. पुन्हा काही दिवसांनी कामानिमित्त ते दापोली येथे स्थायिक झाले तरीदेखील प्रकाशच्या वागण्यामध्ये काहीच बदल झालेला नव्हता.
शेवटी केले काम तमाम
प्रकाश अधून-मधून घरी येऊन लग्नासाठी वाद घालत असल्याने त्याला बलखंडे कुटुंब अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र, 19 फेब्रुवारीला तो घरामध्ये शिरला आणि त्याने पुन्हा तेच विचारण्यास सुरुवात केली. तेव्हाही मुलीच्या कुटुंबीयांनी स्पष्ट विरोध दर्शविल्यानंतर त्याने सोबत नेलेल्या चाकूने मुलीची आई सुरेखा, मुलगी सुजाता आणि वडील सिद्धार्थ यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यामध्ये वडिलांनी कसाबसा आपला जीव वाचवत खिडकीतून उडी घेऊन शेजाऱ्यांना बोलवण्यासाठी घराबाहेर धाव घेतली. मदतीसाठी आरडा-ओरडा करून घर मालकाला बोलवले. घर उघडून पाहिल्यानंतर त्यांना माय-लेकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.
पनवेल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा
या क्रूर हत्येप्रकरणी रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर पोलीस ठाण्यात प्रकाशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत होते. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी प्रकाशने आपल्या मूळ गावाकडे धाव घेऊन, गावापासून काही अंतरावर असलेल्या शेत शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बलखंडे कुटुंबाने ग्रामस्थांसह नुकतेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन कळमनुरी पोलीस ठाण्यामार्फत गृहमंत्र्याना दिले होते.