हिंगोली - 2021 या वर्षात हिंगोली जिल्ह्यात खूप मोठ्या घटना घढल्या. 15 मे रोजी कोरोनाशी झुंज देताना खासदार राजीव सातव यांचे निधन झाले. तसेच, या एका वर्षात 61 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. यांसह, वर्षभरात जिल्ह्यात इतरही काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत. त्याचा हा आढावा.
- काँग्रेस नेते तथा दिवंगत खासदार राजीव सातव यांचे निधन : मागील काही वर्षांपासून खासादर राजीव सातव यांच्या रुपाने मागासलेला हिंगोली जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने राष्ट्रीय स्तरावर गाजत होता. जिल्ह्यातील समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असे. मात्र, 15 मे रोजी कोरोनाही झुंज देताना त्यांचे निधन झाले. सातव यांची पोकळी ही अजूनही भरून निघालेली नाही.
- आमदार संतोष बांगर यांची वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ : कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच या न त्या कारणाने चर्चेत राहतात. एका युवकाची दुचाकी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली असता, त्या युवकाने थेट आमदार संतोष बांगर यांना फोनवरून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून आपल्यावर कारवाई होत असल्याची तक्रार केली. त्यावेळी बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याकडे फोन देण्याची सूचना केली असता, कर्मचारी कारवाईत व्यस्त असल्याने, त्यांनी फोन उशिरा घेतला. त्यामुळे, बांगर यांचा पारा चढला व त्यांनी फोन उशिरा घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे, बांगर हे वर्षेभर चांगलेच चर्चेत राहिलेत.
- आमदाराने घोड्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराजांना घातला हार : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 14 फुट उंच असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे वसमत येथे थाटामाटात स्वागत करण्यात आले. मात्र, घाईगडबडीत राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी थेट घोड्यावर चढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या कृतीचा निषेध व्यक्त केला जात होता, त्यामुळे आमदार नवघरे यांनी जाहीर माफी मागूनही त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.
- मच्छीमाराने पाण्यात वाहत असलेल्या सोयाबीनच्या सुडीचा केला पाठलाग : झाकून ठेवलेली सोयाबीनची सुडी पाण्यात वाहून जात असल्याचे पाहून एक मच्छीमार ती पकडण्यासाठी जिवाची जराही पर्वा न करता होडीच्या साह्याने सुडीचा पाठलाग करीत होता. मात्र, त्याला ग्रामस्थांनी पुलावर पकडून त्याचा जीव वाचविला. या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्या व्यक्तीचा रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या युवकाने जीव वाचवला.
- विधानसभेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड : काँग्रेसचे विधानसभेचे आमदार शरद रणपिसे यांचे सप्टेंबरमध्ये आकस्मिक निधन झाल्याने त्यांची जागा रिक्त झालेली होती. त्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर, त्यांच्या विरोधात भाजपकडून संजय केनेकर यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसच्यावतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले होते. काँग्रेसच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात भाजपचे उमेदवार संजय केनेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे, सातव यांची विधानसभेवर बिनविरोध निवड झाली. त्यामुळे, हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
- हिंगोलीच्या वैभवचे यूपीएससीत यश : शहरातील वांजरवाडा भागातील रहिवासी असलेल्या वैभव बांगरने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश संपादन केले. वडिलांनी आनंद व्यक्त करत मुलाने माझे स्वप्न पूर्ण केल्याचे सांगितले. त्याला देशात ४४२ वी रँक मिळाली होती. अवघ्या २२ व्या वर्षी वैभवने यश संपादन केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक झाले. वैभवला लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा होती. तो अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तसा अभ्यास करत होता. वैभवने हिंगोली येथील विद्यानिकेतन स्कूलमध्ये आठवीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर पुणे येथील बी.के. बिर्ला कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात बी.ए. ला प्रवेश घेतला आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. इकडे वडील देखील आपला मुलगा अधिकारी होणारच या आशेवर मुलाला पाहिजे ती मदत करत होते. वैभव तब्ब्ल चार वर्षांपासून रात्रंदिवस एक करीत अभ्यास करीत होता. चार वर्षांच्या खडतर प्नयत्नांनंतर वैभवने यश संपादन केले.
- आरोग्य मंत्र्याच्या कार्यक्रमात विना मास्कवाल्यांची तोबा गर्दी : कोरोना काळात आरोग्य मंत्री हिंगोलीत आले असताना ते एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेथे कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. त्यावेळी अनेक जण विनामास्क उपस्थित होते. त्यामुळे, आरोग्य मंत्र्याची ही बैठक जिल्हाभरात चांगलीच चर्चेला आली होती.
- कळमनुरी येथे दोन गटांत वाद; बंदुकीतून गोळीबार : कळमनुरी येथे दोन गटात झालेल्या वादात छर्र्याच्या बंदुकीतून गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी 47 जणांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- शेतीच्या वादातून पत्नीने पतीला संपविले : दिवसेंदिवस शेतीचे वाद हे विकोपाला जात आहेत. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील बेलमंडल येथे घडली. सुनियोजित पद्धतीने पत्नीने व दोन मुलांनी आपल्या वडिलांचा खून केला. आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात नेऊन जाळला. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसांनी पत्नी व दोन मुलांना बेड्या ठोकल्या.
- जिल्हा परिषद शाळेतील कार्यालयाला शॉटसर्किटमुळे आग : कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथील जिल्हा परिषद शाळेतील कार्यालयाला शॉटसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली होती. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीत जिल्हा परिषद शाळेच्या कार्यालयातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. जवळपास 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बबन जाधव यांनी दिली होती. आशा विविध घटनेने हिंगोली जिल्हा खूपच चर्चेत राहिला.
- निवडणूक केंद्रात अनधिकृत शिरून पाहणी केल्याने आमदाराविरुद्ध गुन्हा : जिल्ह्यातील सेनगाव आणि औंढा नागनाथ नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी औंढा नागनाथ येथील नागनाथ महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात कार्यकर्त्यांसह अनधिकृत प्रवेश केला होता. त्यामुळे, मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात मतदान केंद्र अधिकारी दयानंद कल्याणकर यांच्या तक्रारीवरून बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.