हिंगोली - संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आज मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीमध्ये 29 सप्टेंबर रोजी आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दिशा अजून ठरविण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुख अॅड. अमोल जाधव यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबाबत चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तहसील कार्यालयासमोर व हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत ढोल बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. तसेच मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. बैठकीत राज्य शासनाने जाहीर केलेली पोलीस भरती थांबवून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये, अशीही चर्चा करण्यात आली.
बैठकीला वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ, कळमनुरी आदी ठिकाणावरून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, स्वयंसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येनेे उपस्थित होते. तर बैठक स्थळी गोपनीय शाखेचे ही पोलीस कर्मचारी आजूबाजूने लक्ष ठेवून होते. एकंदरीतच या बैठकीमुळे पुन्हा एकदा संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा पुन्हा एकदा संपूर्ण राज्यामध्ये घूमणार आहेत. तर दुरीकडे पोलीस प्रशासनही मराठा क्रांती मोर्चा हालचालीवर लक्ष ठेवून आहे. कोरोना काळात होणाऱ्या आंदोलनामुळे सर्वच प्रशासकीय यंत्रणादेखील कामाला लागलेली आहे.