हिंगोली - संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्याच धर्तीवर जिल्ह्यातही या रॅलीचे आयोजन करण्यात आले. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच देशाच्या पंतप्रधानपदी लोकांनी विराजमान करावे, असे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले.
रॅलीमध्ये शहरातील भाजप कार्यकर्ते दुचाकीसह सहभागी झाले होते. रॅली नरसी नामदेव मार्गे सेनगावकडे रवाना झाली. कनेरगाव नाका येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीत देशभक्तीपर गीत लावण्यात आल्यामुळे ही रॅली जिल्ह्याचेच आकर्षण ठरली. हिंगोली येथे रॅलीला आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीत मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. युवकांमध्ये उत्साह दिसून आला. यासोबतच वयोवृद्ध मंडळीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये अशा रॅल्या काढण्यात आल्या. या रॅलीतून जनतेला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद मोदी यांनाच विराजमान करावे, असे आवाहन करण्यात आले.