गडचिरोली - दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली ते भामरागड या दोन तालुक्याला जोडणारे अंतर 70 किलोमीटरचे आहे. या मार्गावरील गट्टा, कोठी या गावांमधील दोन पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. या रस्त्याचे काम व रखडलेल्या पुलाचे काम सुरू करण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
एटापल्ली ते भामरागडमधील जवळपास 30 ते 40 गावांच्या विकासाच्या दृष्टीने हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे. दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावर गट्टा (जांबीया) हे एटापल्ली तालुक्यातील शेवटचे गाव आहे. तसेच भामरागड तालुक्यातील कोठी हे शेवटचे गाव आहे. या दोन गावात फक्त 18 किमी अंतर आहे. यादरम्यान, दोन नाल्यांवर पुलाचे बांधकाम अर्धवट करून सोडून दिले आहे. संबंधित काम रखडल्याने दोन तालुक्यांचा संपर्क पावसाळ्यात पूर्णपणे तुटतो.
एटापल्लीवरून गट्टापर्यंत बससेवा सुरू आहे. तसेच भामरागडवरून कोठीपर्यंत बससेवा नियमित सुरू आहे. परंतु, दोन गावातील नाल्यांवरील पुलाचे बांधकाम न झाल्याने भामरागडवरून एटापल्लीला जाण्यासाठी आलापल्लीवरून फिरून जावे लागत आहे.
हेही वाचा - ''कॅब'साठी पक्षाने भूमिका मांडली आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल'
या दोन पुलांचे बांधकाम 1996 - 97 च्या दरम्यान 'बीआरओ'च्या माध्यमाने सुरू करण्यात आले होते. एका पुलाचे पिलरपर्यंत कामही पूर्ण करण्यात आले. मात्र, काम अर्धवट सोडून बीआरओ कंपनी निघून गेली. तेव्हापासून नक्षल्यांच्या भीतीने कोणीही ठेकेदार हे काम घेत नाहीत. परंतु, नुकताच या पुलांचा व रस्त्यांचा सर्व्हे सुरू आहे. त्यामुळे लवकरच रखडलेल्या पुलाचे काम सुरू होईल, असे चित्र दिसत आहे.
हा रस्ता सुरू झाल्यास भामरागड तालुक्यातील कारमपल्ली, कीयर, हलवेर, नारगुंडा, पिडिमीली, कोठी, मरकनार, तुमरकोडी, मुरुमबुसी, तोयनार तसेच एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबीया, आलेंगा, सुरजागड, मंगेर, नेंडेर परसलगोंदी, आलदंडी, परिसरातील 30 ते 40 गावांच्या विकासाला गती मिळणार आहे.