गडचिरोली - सतत चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्यात अनेक रस्ते वाहून गेले. तर अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे 'खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा' असे चित्र सध्या या ठिकाणी पाहायाल मिळत आहे. परिणामी वाहनचालकांना या ठिकाणाहून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 26 ते 29 जुलैला सतत चार दिवस मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक नाल्यांना पूर आल्याने शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. आता पाऊस थांबला असला तरी रस्त्यांची अवस्था वाईट झाल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली शहरातून जाणारा चामोर्शी, आरमोरी मार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. हीच अवस्था चामोर्शी-मुल आणि चामोर्शी-आष्टी या मार्गाची झाली आहे. त्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात घडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्याचा विचार केल्यास रस्ते बांधकामांसाठी सर्वाधिक निधी मिळतो. दरवर्षी रस्त्यांचे बांधकाम व डागडुजी होते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने अल्पावधीतच रस्ते उखडून जातात. त्यामुळे अनेकदा किरकोळ तसेच मोठे अपघात घडत असतात. गडचिरोली शहरातून 930 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. सिमेंट काँक्रीट करण्यासाठी रस्त्याची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या कडेला बांधण्यात आलेल्या उंच नाल्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होत नाही. मात्र या सर्व बाबींकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
गडचिरोली शहरातील अंतर्गत रस्तेही पूर्णता चिखलमय झाले आहेत. त्यामुळे चिखल तुडवत विद्यार्थांना व नागरिकांना जावे लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा मुलामा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र मुरुमामुळे रस्ता आणखी चिखलमय होत आहे. प्रशासनाने वेळीच रस्त्यांची डागडुजी करून रस्त्यांवर खड्डे पडणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे.