धुळे- सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी भाजपने दाखवलेली तत्परता, तसेच सीबीआय चौकशीसाठी केलेला पाठपुरावा ही भाजपची दुटप्पीपणाची भूमिका असून हीच तत्परता भाजपने विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात केलेल्या आत्महत्या प्रकरणानंतर का दाखवली नाही, असा सवाल काँग्रेसचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण करीत आहेत. आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास असून त्यांनी केलेला तपास हा योग्य दिशेने सुरू आहे. भाजपने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी ही अत्यंत चुकीची असल्याची प्रतिक्रिया शामकांत सनेर यांनी व्यक्त केली.
शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात केली होती आत्महत्या
जामिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. २८ जानेवारी २०१८ ला धर्मा पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील यांनी वैतागून आत्महत्येचे पाऊल उचलले होते.
हेही वाचा- अभिमानास्पद! महाराष्ट्रातील सुपुत्राने बनवले स्वदेशी विमान, 'ही' आहेत वैशिष्ट्ये..