चंद्रपूर - जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या दोघांवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना आज सकाळच्या वेळी मामला जंगलात घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघेही चोरगाव येथील रहिवासी आहेत.
राजेंद्र मरसकोल्हे आणि भिवचंद कन्नाके, असे जखमींची नावे आहेत. आज सकाळी चंद्रपूर तालुक्यातील मामला येथील जंगलात काही गावकरी सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. तेव्हा अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यात राजेंद्र आणि भिवचंद हे दोघे गंभीर जखमी झाले. दरम्यान, त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. त्यांनी अस्वलाला पळवून लावले. त्यामुळे दोघांचा जीव बचावला. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून आतापासूनच उन्हाळा सुरू झाल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळीदेखील खालावली आहे. अशावेळी जंगलातील नैसर्गिक साठ्यांवरही परिणाम होत असून वन्यजीवदेखील पाण्याच्या शोधात भटकंती करत आहेत.