चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील बफर क्षेत्रातील वाढोली येथे एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीमध्ये पडून दोन अस्वलांसह दोन पिलांचा मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी (ता.29) उघडकीस आली आहे.
जिल्ह्यात सात दिवसात ही दूसरी घटना घडली आहे. या आधी वाघाचा बछडा केळझर वनक्षेत्राच्यामधील दाबगाव येथे एका शेतामधील विहिरीत पडला होता. त्या बछड्याला वाचविण्यास वन विभागाला यश मिळाले. त्यानंतर ही दूसरी घटना आहे. यात दोन अस्वल आपल्या दोन पिलांसोबत पडून मृत्यु झाला. विहिरीला कठडे नसल्यामुळे त्यांचा जीव गेला आहे. अशा कठडे नसलेल्या विहिरीमुळे बरेच वन्यजीव मरण पावतात. शासनाकडून शेत विहिरीकरीता निधी मिळतो तरी देखील विहीरी दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे अशा घटना वारंवार होत असतात. ही घटना आज उघडकीस आली. मात्र हा अपघात दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुरुवातीला पिलं विहिरीत पडली आणि त्यांना वाचविण्यासाठी गेलेली अस्वले देखील त्यात पडली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यासंदर्भात पुढील तपास वन विभागाचे कर्मचारी करत आहेत.