चंद्रपूर - आमच्याकडे 170 आमदारांचा पाठिंबा असल्याने स्पष्ट बहुमत आहे. बहुमत आहे म्हणूनच देवेंद्र फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येत्या 30 तारखेला आम्ही आमचे बहुमत सिद्ध करून दाखवू, असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने जनादेश आला. मात्र, शिवसेनेला जनादेशापेक्षा खुर्चीची जास्त चिंता होती. आमच्याकडे बहुमत आहे असे ते सांगत फिरले. राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिले असतानाही ते सरकार का बनवू शकले नाहीत, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
हेही वाचा - शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सर्वोच्च न्यायालयात धाव; शपथविधी घटनाबाह्य असल्याचा आरोप
राज्यात स्थिर सरकार यावे अशी जनतेची इच्छा आहे. त्याला मान देत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. हे सरकार निश्चित पाच वर्षे चालेल. आम्ही बहुमत कसे सिद्ध करू हे 30 तारखेला दिसेलच, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला.