चंद्रपूर - कापूस वेचून घराकडे परतणाऱ्या कामगारांना घेऊन येणारा टेम्पो पलटी झाल्याने एक महिला कामगार जागीच ठार झाली. उषाबाई सखाराम चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात इतर 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. राजूरा तालुक्यातील लक्कडकोट येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.
पोंभुर्णा तालुक्यातील कामगार कापूस वेचणी करण्यासाठी राजुरा तालुक्यातील देवाळा येथे गेले होते. नेहमीप्रमाणे कापूस वेचणीचे काम करून घराकडे परत येत होते. त्यांचा टेम्पो एका ट्रकला ओव्हरटेक करताना पलटी झाला. टेम्पोत एकूण 19 कामगार बसलेले होते. त्यात कापूसही भरलेला होता आणि त्यावर कामगार बसले होते. त्यामुळे टेम्पो पलटी झाल्यानंतर कामगार बाजूला फेकले गेले. यात उषाबाई सखाराम चौधरी या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - 2019 : वर्षभरात हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांकडून तब्बल 81 कोटींचा दंड वसूल
ही घटना झाल्यानंतर तत्काळ रुग्णवाहिका बोलवण्यात आली. जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजुरा पोलीस करत आहेत.