चंद्रपूर- खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा परत घ्यावा, या मागणीसाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी एकदिवसीय सत्याग्रह करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, त्याचा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विरोध केला जात आहे. काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी ही केवळ राहुल गांधी यांची नसून सर्व जबाबदार पदाधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपला राजीनामा परत घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या सर्व स्तरातून होत आहे.
राहुल गांधींनी राजीनामा मागे घेऊन अध्यक्षपदी रहावे, या मागणीसाठी शुक्रवारी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रियदर्शनी चौकात सत्याग्रह करण्यात आला. देशाला केवळ गांधी घराणेच वाचवू शकते. त्यामुळे राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेऊन येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्याासाठी प्रयत्न करावेत, असे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर यांनी म्हटले आहे.
या सत्याग्रहात नगरसेविका सुनीता लोढीया आणि काँग्रेसचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.