चंद्रपूर - ग्रामीण भागात संचारबंदी सुरळीत राहावी याची जबाबदारी पोलीस पाटलांना देण्यात आली आहे. मात्र, शहरालगत असलेल्या अजयपूर येथे पोलीस पाटलाकडूनच याचे उल्लंघन करण्यात आल्याची घटना समोर आली. तेराव्याच्या कार्यक्रमात जेवणातून तब्बल 40 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांना जवळच्या चिचपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. तर काही जणांवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
देशासह राज्यावरही कोरोनाचे संकट घोंगावत असताना ग्रामीण भागात यातून कुठलाही बोध घेतला जात नसल्याचे चित्र चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. अजयपुर येथील पोलिस पाटलाच्या घरी तेरव्या दिवसाचे जेवण होते. यासाठी गावाला निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, दुपारपासून जेवण केलेल्या लोकांना मळमळ उलट्या व तापाचा त्रास सुरू झाला.
रूग्ण वाढल्याने जवळच्या चिचपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात काही लोक हलवण्यात आले. तर, रात्री उशिरापर्यंत रुग्णांची आरोग्य केंद्रातील भरती सुरूच असल्याने काहींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान देशात लॉकडाऊन सुरू असताना नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. संचारबंदी असताना कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस पाटलाच्या घरीच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान चिचपल्ली येथे डॉक्टरांचे चमू रवाना झाली असून स्थानिक परिचारिका व डॉक्टर या रुग्णांवर उपचार करत आहेत.