चिमूर (चंद्रपूर) - राज्य निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. यामध्ये चिमूर तालुक्यातील ८५ ग्रामपंचायतींकरीता निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी ५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार नाहीत.
चिमूर तालुक्यातील म्हसली, जवराबोडी व हिवरा ग्रामपंचायतींमधील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर भिसी ग्रामपंचायतीच्या ६५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. कन्हाळगाव ग्रामपंचायतीमध्ये २ सदस्य बिनविरोध आणि ५ सदस्यांच्या जागाकरता उमेदवारी अर्जच आला नाही. त्यामुळे तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार नाही.
१, ४९६ उमेदवारांनी भरले होते अर्ज
चिमूर तालुक्यातील एकुण ९३ ग्रामपंचायतीपैकी ८५ ग्रामपंचायतींकरीता राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशा प्रमाणे निवडणुक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे .ग्रामपंचायत सदस्यांकरीता इच्छुक १, ४९६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यापैकी २२ अर्ज अवैध तर १, ४७४ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी ७ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या म्हसली, जवराबोडी आणी हिवरा ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
१, ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात!
कन्हाळगाव ग्रामपंचायतीकरीता दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे. इतर पाच सदस्यांकरीता उमेदवारी अर्जच प्राप्त झाले नाहीत. भिसी नगर पंचायतीचा मार्ग मोकळा करण्याकरीता ६५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. तर एकाने अर्ज मागे न घेतल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. तालुक्यात ८० ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीकरीता १, ११७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानात भविष्य ठरणार आहे.