चंद्रपूर- जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेच्या निवडणूक रिंगणात १०३ उमेदवार उतरले आहेत. यातून किती माघारी घेतात याचीच उत्सुकता मतदारांना आहे. नगरपरिषद निवडणुकीमुळे गडचांदूरचे राजकीय वातावरण तापु लागले असून निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगणार असल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यातील गडचांदूर नगरपरिषदेसाठी ९ जानेवारीला मतदान होणार आहे. नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी एकूण १०३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. गडचांदूर पालिकेच्या ८ प्रभागातील १७ नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षपदासाठी विविध राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात १७ नगरसेवक पदासाठी १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात ९७ उमेदवारी अर्ज पात्र ठरले असून ५ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. तसेच नगराध्यक्ष उमेदवारीसाठी विविध राजकीय पक्ष व अपक्षाद्वारे ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यात ६ अर्ज पात्र ठरले आहेत.
सदर अर्ज छाननी कार्यक्रमात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रपूर उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून राजुऱ्याचे तहसीलदार रवींद्र होळी, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गडचांदूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी काम पाहिले.
कुणाच्या चूलीवर कुणाची भाजी ?
राज्याचा धर्तीवर महाआघाडीच्या स्थापणेसाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधला होता, असे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदिप गिर्हे यांचे म्हणने आहे. मात्र, शिवसेनेने आमच्याशी संपर्क साधला नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. सोबतच राज्यातील समिकरण स्थानिकस्तरावर लागू होतीलच असे नाही, असे काँग्रेसचे आमदार सूभाष धोटे म्हणाले. आता शिवसेना संघटना, गोंडवाना, मराठा सेवा संघ यांची युती झाली आहे. दुसरीकडे स्वतंत्रपणे लढणाऱ्या भाजपाकडे ऐन विधानसभा निवणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी प्रवेश केला होता. त्यामुळे, भाजपची ताकद वाढली आहे.असे असले तरी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या महिला उमेदवाराचे पती राष्ट्रवादीकडून नगरसेवक झाले होते. त्यांनी नुकतेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. शिवसेनेच्या या खेळीने भाजपाकडे जाणाऱ्या मतांवर काही प्रमाणात ब्रेक लागणार आहे.