बुलडाणा : जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पातून 70.12 टक्के भरला आहे. आज (शुक्रवारी) सकाळी 9:00 वाजता प्रकल्पाचे एकूण 5 दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडली असून नदीपात्रात 3 हजार 808 घनमीटर प्रति सेकंद एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे व कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे खडकपूर्णा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहाण्याचे खडकपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून नद्या, नाले तुडंब भरून वाहत आहेत. खडकपूर्णा प्रकल्पात 70.12 टक्के भरला असून प्रकल्पाचा प्रकल्पीय संचयीत साठा 93.40 दलघमी आहे व पूर्ण संचय पातळी 520.50 मीटर आहे. प्रकल्पात सद्यस्थितीत 519.50 मीटर जलाशय पातळी असून 65.49 दलघमी पाणीसाठा आहे. गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग प्रकल्पाच्या उर्ध्व भागात पाणलोट क्षेत्रात येत आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक वाढली तर कोणत्याही क्षणी नदीला पूर येऊ शकते. त्यामुळे, पूर नियंत्रणासाठी प्रकल्पाचे 5 दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले आहे. त्यामुळे खडकपूर्णा नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, नदीकाठावरील गावांपैकी दे. राजा तालुक्यातील निमगांव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बु, डिग्रस खु, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगांव वायाळ, साठेगांव, हिवरखेड, राहेरी खु, तडेगांव, राहेरी बु, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगांव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगांव व सावरगांव तेली गावांना सतर्कतेचा इशारा उपविभागीय अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प व्यवस्थापन उपविभाग, दे. मही यांनी दिला आहे.