भंडारा- जिल्ह्यात मागील 24 तासात 4 रुग्ण सापडले असून पहिल्यांदा एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. ही माहिती पुढे येताच पोलीस विभागामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चार पैकी एक रुग्ण हा पवनी तालुक्यातील असल्याचे जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. मात्र, सायंकाळी तो रुग्ण पवनी चा नसून भंडारा शहरातील आहे, अशी माहिती देण्यात आली. एवढी मोठी चूक कशी आणि कोणाकडून झाली हे मात्र समजू शकले नाही.
भंडारा जिल्ह्यात कोरोना हळूहळू पाय पसरत आहे 24 तासात चार नवीन रुग्ण आढळले असून यापैकी 2 भंडारा शहरातील, 1 लाखांदूर तालुक्यातील आणि एक साकोली तालुक्यातील आहे.भंडारा शहरातील एक रुग्ण हा 31 वर्षीय पोलीस कर्मचारी असून तो सध्या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेक पोस्टमध्ये आपले कर्तव्य बजावत होता. यादरम्यान बाहेरून आलेल्या बऱ्याच लोकांचे तपासणी करतांना अप्रत्यक्षपणे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला कोरोना झाला असावा, अशी माहिती पुढे येत आहे.तिथे कार्यरत इतर पोलीस कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन केल्यानंतर सर्वांचे घश्यातील स्त्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले, बाकी कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. मात्र,या कर्मचाऱ्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. भंडारा मधील पोलीस शनिवारपर्यंत या कोरोना पासून मुक्त होते. मात्र, रविवारी एका कर्मचाऱ्याच्या अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्ह्यातील इतर कर्मचारी सतर्क झाले त्यांना असून कर्तव्य बजावताना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी पोलिसांसाठी अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृहात विशेष क्वारंटाइन सेंटर बनवले असून या पोलीस कर्मचाऱ्याशी संपर्कात आलेल्या लोकांना या सेंटर मध्ये ठेवले जाणार आहे.
रविवारी सकाळी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये तीन नवीन रुग्ण मिळाल्याचे सांगितले होते. या पैकी एक रुग्ण हा पवनी तालुक्यातील भुयार येथील आहे अशी माहिती दिली होती. मात्र, माध्यमांना आणि शहरातील बहुतांश लोकांना हा व्यक्ती भंडारा शहरातील चांदणी चौक परिसरातील आहे,असे माहिती होते.
जिल्हाधिकारी यांनी पवनी तालुक्यतील असल्याचे सांगितल्याने माध्यमांवर तश्याच बातम्या लावल्या गेल्या. मात्र,सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिकृतरित्या पुन्हा सुधारित माहिती पाठवून ती व्यक्ती पवनी तालुक्यातील नसून भंडारा शहरातील असल्याचे सांगितले. जी गोष्ट संपूर्ण शहराला, माध्यमांना माहिती झाली होती ती माहिती आरोग्य यंत्रणेला का माहिती झाली, तो व्यक्ती भुयार या चेक पोस्ट वरून आला म्हणून त्याला भुयार येथील कसे घोषित केले गेले. आरोग्य यंत्रणेने एवढी मोठी चूक कशी केली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे.