आष्टी (बीड) - छत्रपती शिवाजी महाराज जातीधर्माचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन चालणारे सामान्यांच्या हृदयातील राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर झालेला राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रात नवे युग निर्माण करणारी घटना असून, या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि आज छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गौरवशाली इतिहासाने महाराष्ट्रासह भारतीयांचे प्रेरणा व उर्जास्थान बनले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार भिमराव धोंडे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त 'शिवस्वराज्य दिन' आष्टी येथील पंचायत समिती कार्यालयात साजरा करत भगवी गुढी उभारण्यात आली. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे जेष्ठ नेते माजी आमदार भिमराव धोंडे यांनी भगव्या गुढीचे पुजन केले. यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर, आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती माधुरी जगताप, उपसभापती रमेश तांदळे, पं.स.सदस्य आदिनाथ सानप, अशोक मुळे, कडा कृ.उ.बा.समितीचे सभापती राजेंद्र दहातोंडे, तळेकर, पत्रकार उत्तम बोडखे, दादासाहेब जगताप, पंचायत समिती सर्व सदस्य, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.