परळी वैजनाथ (बीड) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची परंपरा पुढे जोपासताना एक भक्त म्हणून दरवर्षी दर्शनासाठी येते, यात खंड पडू दिला नाही. संतांचे केवळ दर्शन पुरेसे नाही, त्यांचे विचारही जगावे लागतात अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाविक भक्तांना संबोधित केले. वारकरी संप्रदायातील थोर संत वै. वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आज लाखो भक्तांच्या उपस्थितीत गहिनीनाथ गडावर मोठया उत्साहात पार पडला, यावेळी त्यांनी भक्तांशी संवाद साधला. व्यासपीठावर येण्यापूर्वी पंकजा मुंडे व खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांनी त्यांचे यावेळी स्वागत केले.
गहिनीनाथ गड तमाम भाविकांचे श्रद्धास्थान
गहिनीनाथ गड तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आहे, कुठेही असो हा क्षण कधी चुकवू दिला नाही. तुमच्या सर्वांमध्ये मला वामनभाऊंचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दर्शनासाठी मी इथं येते. पालकमंत्री असताना गडाच्या विकासाकरता योगदान दिले, पुढेही देत राहू. आज देण्यासारखं काही नसलं तरी प्रेमाची देवाणघेवाण मात्र होत राहील असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. संयम, क्षमाभाव आणि परोपकार ही संतांची शिकवण आत्मसात करण्याची खरी गरज आहे, त्यांच्या संघर्षाची ज्योत घेऊन पुढे चालायचे आहे. संत वामनभाऊंचे विचार दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणून कर्म केले तरच पुण्य लाभेल, असे सांगून आपण मिळालेल्या संधीचं सोनं केल भविष्यातही करू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जेसीबीने फुलांची उधळण
दरम्यान पंकजा मुंडे व खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांचे गडावर आगमन झाल्यानंतर व्यासपीठाकडे जातांना कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर जेसीबीने फुलांची उधळण केली. या सत्काराने भारावून गेल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.