बीड - ज्या वयोवृद्ध असलेल्या नागरिकांना मुले असूनही ते सांभाळत नाहीत अथवा मनोरुग्ण, मतिमंद असलेल्या वयोवृद्धांना आधार देण्याचे काम एक दाम्पत्य करत आहेत. त्या निराधार वयोवृद्धांना दोन वेळेचे जेवण, राहायला निवारा देण्याचे काम बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन येथील तांबे कुटुंबीय करत आहेत. 'आजोळ' परिवाराच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून हे कार्य तांबे दाम्पत्य करत आहे. 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
'आजोळ'ची निर्मिती कशी झाली?
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात राक्षस भुवन येथे सामाजिक कार्यकर्ते कर्ण एकनाथ तांबे व त्यांच्या पत्नी कोमल तांबे यांनी तीन वर्षांपूर्वी राक्षसभुवन गावात वयोवृद्धांसाठी आजोळ परिवार संस्थेची सुरुवात केली. या आजोळ परिवार सुरू करण्यामागे कारण देखील तसेच महत्त्वाचे आहे. आजोळ परिवाराच्या निर्मितीबाबत सांगताना कर्ण तांबे म्हणाले की, मी जेव्हा कोल्हापूरला डीएडचे शिक्षण घेत होतो तेव्हा मी शहरात फिरत असताना, अनेक मनोरुग्ण रस्त्याच्या कडेला भीक मागणारे वयोवृद्ध भिकारी पाहायचो. त्यांच्या वेदना मला असह्य करायच्या. त्यांना पाहून माझे मन हेलावून जायचे.
हेही वाचा - विशेष : कोविडमध्ये मोफत वैद्यकीय सल्ला देणारे साताऱ्यातील 'धन्वंतरी'
पत्नीची सर्वकाळ मदत -
माझी जडणघडण वारकरी संप्रदायात झालेली असल्याने सेवाभाव ही वृत्ती माझ्या अंगात पूर्वीपासूनच होती. ज्या वयोवृद्धांना मुले असूनही सांभाळत नाहीत अथवा मनोरुग्ण आहेत म्हणून घरच्या लोकांनी सोडून दिले आहे, अशा वंचितांचे अश्रू पुसण्यासाठी मला काही करता येईल का? याचा सतत मनामध्ये विचार करत होतो. याबाबत मी माझी पत्नी कोमल हिच्याशी सतत बोलत होतो. या सगळ्या चर्चेतून आपण वृद्धांच्यासाठी निवासी आश्रम सुरू करण्याचा विचार समोर आला. मात्र, माझ्याजवळ वयोवृद्धांसाठी आश्रम सुरू करायला पैसे नव्हते. वडिलांनी 10 वर्षांपूर्वी गावाबाहेर जागा घेतली होती. ती जागा मी वडिलांकडून आश्रम सुरू करण्यासाठी मागून घेतली. तीन वर्षांपूर्वी त्याच जागेत आजोळ परिवार संस्थेची सुरुवात केली. माझ्या या सगळ्या कामांमध्ये माझी पत्नी कोमल तांबे ही आजही सोबत आहे. परिवारात दाखल असलेल्या 15 वृद्धांची सर्व देखभाल कोमल करते, असे मोठ्या अभिमानाने कर्ण तांबे यांनी सांगितले.
'आजोळ' परिवारात दाखल असलेल्या प्रत्येक वयोवृद्धांची कैफियत अंगावर काटा उभा करते. आजोळ परिवारात सात महिन्यांपूर्वी दाखल झालेले 93 वर्षीय वैजनाथ बापुनाथ गोदरे यांना एक मुलगा आहे. तो पुण्यात खासगी कंपनीत काम करतो. असे असूनही वैजनाथ गोदरे यांचा मुलगा त्यांना सांभाळत नाही. सात महिन्यापूर्वी मुलाने पुण्यातून एका रिक्षात आपल्या वडिलांना (वैजनाथ) यांना बसवून दिले. त्यानंतर वडील कुठे आहेत म्हणून सात महिन्यात एकही फोन मुलाने केला नसल्याचे वैजनाथ गोदरे मोठ्या जड अंतकरणाने सांगतात. अशीच वेगवेगळी कैफियत आजोळ परिवारात दाखल असलेल्या इतर वयोवृद्धांची आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात पोटच्या मुलां-मुलींनी झिडकारले आहे. मात्र, कर्ण तांबे व कोमल तांबे हे या वयोवृद्धांना आधार दिला असून त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दानशूरांनी मदत करण्याची गरज -
समाजात वयोवृद्ध आई-वडिलांना न सांभाळण्याची वृत्ती बळावत आहे. हे अत्यंत खेदजनक आहे. आजोळ परिवारात दिवसेंदिवस अशा अनाथ वयोवृद्धांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आजोळ परिवाराला आपली यंत्रणा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कर्ण तांबे म्हणाले.
निराधारांची सेवा हीच माझ्यासाठी ईश्वर सेवा -
आजोळ परिवारात येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांची सेवा करण्याची संधी मला माझे पती कर्ण तांबे यांच्यामुळे मिळाली आहे. रक्ताच्या नात्यातील लोक आपल्या आई-वडिलांबरोबर चुकीचे वागत असल्याचे पाहून डोळ्यात पाणी येते. निराधारांची सेवा हीच माझ्यासाठी ईश्वर सेवा आहे, असे कोमल तांबे म्हणाल्या.
हेही वाचा - नांदेडच्या 14 वर्षीय कन्येची अमेरिकेत गगनभरारी, कोंढा ग्रामस्थांकडून आनंदोत्सव साजरा