बीड - एकात्मतेचे दर्शन दाखवत बीडकरांनी माणुसकी जागवली. सांगली, कोल्हापूर येथे पूर परिस्थितीमुळे लाखो नागरिकांचे घरदार उद्धवस्त झाले आहेत. पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात म्हणून बीडकरांनी कपडे व खाण्याचे साहित्य गोळा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी पाठवले आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातील, शहरातील काही शाळा, महाविद्यालयांनी फेरी काढून पैसे गोळा केले आहेत.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पूर्ण परिस्थितीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक नागरिक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी बीडकर सरसावले आहेत. शुक्रवारी शहरातील विविध भागातून कपडे व खाण्याच्या वस्तू तसेच पाण्याच्या बाटल्या एकत्र करून कोल्हापूर व सांगलीसाठी पाठवण्यात येत आहेत. याशिवाय बीड शहरातील काही शाळा, महाविद्यालयांनी एकत्र येत शहरातून फेरी काढून पैसे गोळा केले आहेत. पैसे व खाण्याच्या वस्तू तसेच कपडे शनिवारी सकाळपर्यंत कोल्हापूर व सांगलीला रवाना करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल वाईकर यांनी दिली. कोल्हापूर व सांगलीकरांसाठी दाखवलेल्या बीडकरांच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या सगळ्या उपक्रमात बीड जिल्ह्यातील विविध संस्था, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. तसेच शाळा महाविद्यालयांनी देखील कोल्हापूर, सांगलीकरांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पहायला मिळाले.