औरंगाबाद - कोरोना काळात उपचार घेणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमधून चक्क साहित्य चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरात सुरू करण्यात आलेल्या 18 पेक्षा अधिक सेंटरमधून या वस्तूंची चोरी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाची मनपा आयुक्तांनी चौकशी सुरू केली आहे.
मनपाने दिल्या दर्जेदार सुविधा..
कोरोना झालेल्या रुग्णांना 14 दिवस क्वारंटाईन करावे लागते. त्यासाठी रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळाव्या यासाठी महानगरपालिकेने आपल्या मालकीच्या इमारतींमध्ये, तर काही ठिकाणी खाजगी इमारतींमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध करत आरोग्य सेवा दिली. ही सेवा देत असताना रुग्णांसाठी काही वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या. ज्यामध्ये गादी, उशी, बकेट, पिलो कव्हर, बेडशीट, माईक सिस्टीम, रेडिओ, टीव्ही, फ्रिज, ऑक्सिमीटर, थर्मल गन असे कोट्यवधींचे साहित्य उपलब्ध करून दिले होते. मात्र, सेंटर बंद केल्यावर यातील बरेच साहित्य पालिकेकडे जमा झाले नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - घरफोड्या रोखण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून जुन्याच यंत्रणेचा वापर
महानगरपालिकेने दिले होते 'हे' सामान
क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना सुविधा मिळावी यासाठी महानगरपालिकेच्या स्टोर विभागाकडून 4 हजार गाद्या, 4 हजार उशा, 4 हजार किट त्यामध्ये साबण, टूथब्रश, तेल असे साहित्य. 1700 बकेट, 1700 मग, 8 हजार पिलो कव्हर, 8 हजार बेडशीट, 10 माईक सिस्टीम, 10 रेडिओ, 10 टीव्ही, 6 फ्रीज, 6 संगणक यांच्यासह ऑक्सिमिटर, थर्मलगन असे साहित्य देण्यात आले होते. यापैकी बरेचसे साहित्य मनपाला परत मिळाले नाही.
आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश...
क्वारंटाईन सेंटरमधून वस्तू गायब झाल्या आहेत, हे प्रकरण आता समोर आले आहे. याबाबत आम्ही चौकशी करत आहोत. खासगी संस्थानच्या वतीने काही सेंटर चालवत होतो. आता कोणाला किती वस्तू दिल्या होत्या आणि त्यापैकी किती वस्तू परत आल्या आहेत त्याची खातरजमा आम्ही करू आणि त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
हेही वाचा - दुचाकी-मालवाहू मोटारीचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक जखमी