छत्रपती संभाजीनगर Tourist Stuck In Sikkim : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असतानाच आता महाराष्ट्रातील आठ पर्यटक सिक्कीममध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न त्यांचे नातेवाईक आणि प्रशासकीय यंत्रणांकडून केले जात आहेत. पण चिंतेची बाब म्हणजे, यातल्या एकाही पर्यटकाशी संपर्क साधण्यात यश आलेलं नाही. सिक्कीममध्ये झालेल्या ढगफुटीचं पर्यवसान महाभयंकर पुरात झालं. सिक्कीमला पुराचा विळखा बसण्याआधीपर्यंत हे सर्व पर्यटक आपापल्या नातेवाईकांच्या संपर्कात होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली आहे. मात्र पूर आल्यानंतर त्यांच्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या पुरात अडकलेले आणि संपर्क होऊ शकत नसलेले आठही पर्यटक छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथील असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबरला हे पर्यटक सिक्कीमला गेले होते. मात्र, आता पुरानंतर त्यांच्यासोबत संपर्क तुटल्यानं त्यांच्या कुटुंबातील सदस्य चिंताग्रस्त आहेत. या सर्व पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणा करत आहेत. मात्र त्यांच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेलं नाही.
सिल्लोड येथील कुणाल सहारे, राजश्री कुणाल सहारे, सर्वेश कुणाल सहारे, साईशा कुणाल सहारे, स्नेश जैन, शीतल जैन, मोक्ष जैन, सिद्धांत जैन अशी सिक्किममध्ये अडकलेल्या पर्यटकांची नावं आहेत. या सर्व पर्यटकांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना सरकारी यंत्रणांकडून मदतीची आस आहे. संपर्क होऊ न शकलेल्या सर्व पर्यटकांशी लवकरात लवकर संपर्क साधून त्यांना सुखरुप आपापल्या घरी आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याचा दावा शासन आणि प्रशासन पातळीवरुन केला जात आहे.