औरंगाबाद - 22 ते 24 नोव्हेंबर दरम्यान जागतिक धम्म परिषदेचे आयोजन औरंगाबादमध्ये करण्यात आले आहे. बुद्धांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी ऐतिहासिक औरंगाबाद शहरात हा 3 दिवसांचा सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला दलाई लामा आणि भिक्खू महानायक महाथेरो डॉ. रकगोडा धम्मसिद्धी हजेरी लावणार आहेत.
औरंगाबादमधील नागसेन वन परिसरात या तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. देशभरातून लाखो उपासक या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. नागसेनवन परिसरातील स्टेडीयममध्ये भव्य एका बुद्ध नगरीची स्थापना केली जात आहे.
हेही वाचा - समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते महंमद खडस यांचे निधन
धकाधकीच्या जीवनात मनाचा समतोल राखण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज आहे. हे विचार रुजवण्यासाठीच औरंगाबादच्या भूमीत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दलाई लामा उपस्थित राहणार असल्याने देश-विदेशातून उपासकांचा ओढा या परिषदेकडे राहील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
तिबेट, नेपाळ, कंबोडीया, श्रीलंका, व्हिएतनाम, कोरीया, आयर्लंड मधूनही उपासक या ठिकाणी दाखल झाले आहेत. चांगले विचार ऐकण्यासाठी नागरिकांनी या परिषदेला हजेरी लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.