औरंगाबाद - दरवर्षी मोठ्या उत्साहाने दक्षिण काशी मानल्या जाणाऱ्या पैठण याठिकाणी साजरा करण्यात येते. मात्र, कोरोना विषाणूच्या भीतीने यावर्षी यात्रा होणार की नाही, याबद्दल अफवेचे वातावरण होते. मात्र, यावर्षीदेखील नेहमीप्रमाणे यात्रा होणार, अशी माहिती कॅबिनेट मंत्री संदीपान पाटील-भुमरे यांनी दिली आहे. यात्रा महोत्सवा संदर्भात आज (मंगळवारी) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
आढावा बैठकीत सर्व खात्यांचे अधिकाऱ्यांना तलब करण्यात आले होते. दरवर्षी होणाऱ्या नाथषष्ठी यात्रेत लाखोंच्या संख्येने भाविक पैठणमध्ये येतात. प्रत्येक खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याबाबत भक्तांना गैरसोय होऊ नये, त्याची ताकीद देण्यात आली. जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रशासनाकडून अशा यात्रा, उरुस, गर्दीच्या ठिकाणी लोकांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, चारशेहून अधिक वर्ष झालेल्या यात्रेच्या परंपरेला यावर्षीही सुरू ठेवायची, असे ठरवण्यात आले आहे.
हेही वाचा - मनमाड-नांदगाव रस्त्यावर अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी
या यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून दिंड्या पैठणसाठी गेल्या पंधरा दिवसांपासून प्रस्थान झालेल्या त्यामुळे ही यात्रा थांबू शकत नाही, असे मंत्री संदीपान पाटील-भुमरे म्हणाले आहेत. पैठण येथे अवघे चार सरकारी डॉक्टर आहेत. त्यांच्या खाली तुटपुंजे असे कर्मचारी आहेत. पंधरा दिवसाआधी झालेल्या बैठकीत मागणी केल्यानंतरही या औषधांचा तुटवडा असल्याचे सरकारी वैद्यकीय अधिकारी यांनी नमूद केले होते. अशा परिस्थितीत पैठण येथे यात्रा भरणे हे घातक ठरू शकते. दहा वर्षापूर्वी चिकन गुनियाच्या साथीने यात्रेत थैमान घातले होते. त्यावेळी बोध घेतल्या नसल्याचे दिसून येत आहे.