औरंगाबाद - सध्या भाजप आणि सेनेमध्ये लुटरुंची भरती सुरू असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. या लुटारुंची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. या सर्व चोरांनी कशा पद्धतीने लूट केली आहे, याची माहिती मी लवकरच जाहीर करणार असल्याचे शेट्टी म्हणाले. ते औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
साताऱ्यामध्ये निघालेल्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात्रेवर कडकनाथ कोंबडी फेकून निषेध व्यक्त केला. राजू शेट्टींनी या आंदोलनाचे समर्थन केले आहे. ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. या कोंबड्यांना अन्न द्या, अशी मागणी शेतकाऱ्यांनी केली होती. मात्र, ती मागणी पूर्ण झाली नसल्याने कोंबड्या अंगावर फेकून काय वाईट केलं, असा प्रश्नही शेटटींनी यावेळी केला.
सध्या जी भरती सुरू आहे ती लुटारूंची आहे. या लुटारूंची यादी मी लवकरच जाहीर करणार आहे. या सर्व चोरांनी कशा पद्धतीने लूट केली आहे याची माहिती मी लवकरच जाहीर करेल. कारवाई करण्याची भीती दाखवून भाजपने या सर्वांना वाल्याचा वाल्मिकी करण्याचे धोरण आखून आपल्या पक्षात प्रवेश दिला असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला.
राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादेत शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबादच्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ जाहीर सभेत बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर कडाडून टीका केली. सांगलीमध्ये जनादेश यात्रेसमोर केलेले आंदोलन म्हणजे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या ४ जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कडकनाथच्या माध्यमातून घोटाळा झाला आहे. यामध्ये सर्वसामान्यांचे 500 कोटी अडकलेले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे पोलीस खाते असून देखील एफआयआर करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. दबाव टाकल्यावर एफआयआर झाल्यानंतर दोन-चार लोकांना अटक करून इतरांना पाठीशी घालण्याचे काम सरकारने केले आहे. इस्लामपूर येथे निष्पाप शेतकऱ्यांवर लाठीचार्ज देखील केला.
नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीवेळी लातूर येथे आले होते. त्यावेळेस त्यांनी सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. २ कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन दिले होते. नोकरभरती तर झाली नाही, मात्र, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुरू असल्याचा टोला राजू शेट्टींनी लगावला. लोकांना लुटणाऱ्याची मेगा भरती सध्या भाजपमध्ये सुरू आहे. चोरांची आणि लुटारूंची ही भरती सुरू असून मी लवकरच एक यादी जाहीर करणार आहे. भाजप आणि सेनेमध्ये गेलेल्या या सर्वांची चौकशी थांबवण्याचे आश्वासन दिल्यामुळे ही भरती सुरू असून, वाल्याचा वाल्मिकी करण्याचे हे धोरण सध्या आखल्याचे ते म्हणाले. लोकांना लुटण्यासाठी की मेगा भरती केली जात असून, दडपशाही केली तर सुशिक्षीत बेरोजगार गप्प बसतील असं वाटत असेल, तर त्यांचा हा गैरसमज असल्याचे शेट्टी म्हणाले.