औरंगाबाद - सदाभाऊ खोत हे गळक मडकं आहे, असा टोला माजी खासदार राजू शेट्टी यांनी नाव न घेता लगावला. कुंभार जेव्हा माठ, मडकं तयार करण्यासाठी माती घेतो, त्याला आकार देतो आणि भट्टीत टाकतो, तेव्हा त्यातील काही मडकी, माठ कच्ची निघतात, गळकी निघतात. अगदी तसेच सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत झाले आहे. मात्र, आम्ही आता मडकी तपासून बघू, असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी औरंगाबादमध्ये केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा, शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत झालेला पराभवाविषयी बोलताना एकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर हे आरोप केले.
राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली तेव्हा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता निवडून, पारखून घेतला होता. पण जसे मडके घडवताना कुंभार एकच माती, साचा वापरतो तरी एखादे मडके कच्चे राहते किंवा गळते, तसाच काहीसा प्रकार सदाभाऊ खोत यांच्या बाबतीत घडला. त्यांचे मडके कच्चेच राहिले. पण भविष्यात असा प्रकार पुन्हा कुणाच्या बाबतीत घडू नये, याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या तरुण, युवा नेतृत्वाला यापुढे संघटनेत प्रोत्साहन देण्याचा आपला विचार आहे.