औरंगाबाद - जगाला मोहिनी घालणाऱ्या अजिंठा लेणीचे अनेक पैलू आहेत. हे सौदंर्य कवितेत मांडण्यासाठी सातवे निजाम उस्मान अली खान यांनी एका शायरला खास कविता करण्यासाठी नियुक्त केले होते. कविता इतकी सुंदर होती की देशाचे दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू देखील या कवितेने प्रभावित होते. मराठवाड्यात स्वातंत्रपूर्व काळात निजामांची सत्ता होती. याच निजामाने सेशन कोर्टाच्या न्यायाधीश असलेल्या शायर सिकंदर अली वज्द यांना एकवर्षाची पगारी सुट्टी देऊन अजिंठा लेणीचं सौंदर्य कवितेत मांडायला सांगितलं.
- शायर सिकंदर अली वज्द यांनी सादर केली मनमोहक कविता -
अजिंठा लेणीचा करिष्मा जगाला अचंबित करणारा आहे. लेणी आणि परिसराचं सौंदर्य डोळे दिपून टाकणारं आहे. जुन्या काळी अजिंठा लेणीला स्वर्गाची उपाधी देण्यात आली होती. या स्वर्गाचं वर्णन शब्दात मांडणं तितकं सोपं नव्हतं. मात्र अजिंठा लेणी आणि परिसराची माहिती सुंदर कवितेच्या रुपात जगासमोर आणावी यासाठी हैदराबादचे सातवे निजाम उस्मान अली खान यांनी प्रयत्न केला. त्यांनी त्याकाळचे सेशन कोर्टाचे न्यायाधीश आणि शायर सिकंदर अली वज्द यांच्यावर अजिंठा लेणीच्या सौंदर्यावर कविता करण्याची जबाबदारी दिली. नुसती जबाबदारी दिली नाही तर त्यांना एकवर्षाची पगारी सुट्टी देखील दिली. शायर सिकंदर अली वज्द हे मूळ औरंगाबादचे होते. त्यामुळे ते अजिंठा लेणीचे वर्णन सुंदररित्या करू शकतील असा विश्वास निजाम उस्मान अली खान यांना होता. सिकंदर अली वज्द यांनी त्यांचा विश्वास खरा करून दाखवला. शायर सिकंदर अली वज्द यांनी अजिंठा परिसरात जाऊन नुसती लेणी नाही पाहिली तर बाहेरून तिचा परिसर पाहिला. वाघूर नदीच्या तीरावर असलेला लेणी परिसर, वरून पडणारा धबधबा, तिथे असणारा निसर्गरम्य हिरवागार परिसर पाहून सिकंदर अली वज्द प्रभावित झाले आणि तिथेच त्यांनी आपल्या कवितेतला पहिला शेर लिहिला ज्यामध्ये त्यांनी अजिंठा लेणीच्या परिसराला "दक्खन कि गोद जहाँ जिग्मे जन्म लेती है..." असं संबोधलं.
- कवितेत कारागिरांचा विशेष उल्लेख -