औरंगाबाद - पैठण म्हटलं की जगप्रसिद्ध पैठणी साडी डोळ्यासमोर येते. मात्र, आधीपासूनच हालाखीच्या परिस्थितीत असलेले पैठणी साडीचे विणकर आज अन्नासाठी वणवण करत आहेत. केंद्र शासन आणि राज्य शासनाने विविध योजनांअंतर्गत देहाडी कामगार, बांधकाम मजूर व इतर कामगारांना मदत पाठवण्याची तरतूद केलीय. मात्र, पैठणी विणकरांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
अहोरात्र कष्ट करून हे कारागीर साड्या तयार करत आसतात. जगप्रसिद्ध कला टिकवून ठेवण्यासाठी त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. यामुळे आजही बाजारात पैठणीची लोकप्रियता कायम आहे. परंतु, हे साडी बनवणारे विणकर आज लॉकडाऊनमुळे मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

पैठण शहर आणि परिसरात पैठणी विणकाम करणारे शेकडो कारागीर आहेत. यापैकी केंद्र शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सरकारी विणकर केंद्रांवर 62 विणकर काम करतात. त्यांच्याकडे महिन्याला दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत काम असते. कामाच्या स्वरुपानुसार जास्तीचे पैसे देखील मिळतात. आठ तास केंद्रात काम करून हे विणकर घरी देखील हॅण्डलूम मशीनवर मुकादमाकडून घेतलेले काम करतात.
आता बाजारातील मागणी घटली; आणि विणकरांवर उपासमारीची वेळ आलीय. कुटुंबाचा उदर्निर्वाह करण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नसल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत चालणाऱ्या पैठण येथील शासकीय पैठणी केंद्रावर देखील अशीच परिस्थिती आहे. सरकारने अद्याप कोणतीही आर्थिक मदत पोहोचवली नसल्याने विणकर अपेक्षा ठेऊन आहेत.

ज्याप्रमाणे देहाडी मजूर, रोहयो मजूर अन्य काही मजूरांना शासनाने तत्काळ मदत पोहोचवून दिलासा दिला आहे. त्याच प्रकारे राज्य किंवा केंद्र शासनाने विणकरांना तत्काळ मदत पोहोचवावी, अशी मागणी हे कामगार करत आहेत.