औरंगाबाद - कोरोना विषाणूची चाचणी आता औरंगाबादेत करण्याचा मार्ग मोकळा झाला असून नमुने तपासणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचे घेतलेले नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे रुग्णांचा तपासणी अहवाल एका दिवसात मिळणार असल्याने रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे.
मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवले जायचे. त्यामुळे त्याचा अहवाल येण्यास जवळपास तीन दिवसांचा कालावधी लागायचा. औरंगाबादला चाचणी सुरू झाल्याने औरंगाबादसह आसपासच्या जवळपास काही जिल्ह्यांना त्याचा फायदा मिळणार आहे.
![corona test lab start in ghati hospital aurangabad](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-aur-1-korona-lab-script-7206289_29032020155159_2903f_1585477319_592.jpg)
औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास ९००हून आधिक जणांना घरीच कॉरेंटाईन करण्यात आले आहे. औरंगाबादसह परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यातून 218 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. औरंगाबाद आणि इतर ठिकाणी संशयित रुग्णांची संख्या पाहता औरंगाबादमध्ये तपासणीची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार घाटी रुग्णालयात यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या लॅबमुळे संशयितांची तपासणी अहवाल एका दिवसात मिळणार असल्याने त्यांच्यावर लवकर उपचार सुरू करण्यास मदत होईल, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं.