औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रशासकीय कार्यालयात ही याचा शिरकाव झाला होता. जिल्हा परिषदेच्या अनेक विभागातील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने 5 दिवस जिल्हा परिषद बंद ठेवण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानंतर सोमवारी कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, 100 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असतानाही 119 कर्मचारी कार्यलयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लॉकडाऊन काळात सरकारने सर्व सरकारी कार्यालयात कमीत कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कामकाज करून घेण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे अनेक कर्मचारी त्याचाच फायदा घेत कार्यालायात उशिरा येणे, तसेच कार्यालयातून लवकर जाणे अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असल्याचे बनसोडे यांच्या निदर्शनास आले होते. यावर 5 दिवसाच्या सुट्टीनंतर कार्यालय सुरू होताच सोमवारी बनसोडे यांनी सायंकाळी ६ वाजता अचानक अनेक विभागांची झाडाझडती घेतली. कार्यालयीन वेळ ६.१५ वाजेपर्यंत असताना जवळपास ११९ कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले. हे कर्मचारी कार्यालयीन वेळ संपण्याआधीच कार्यालय सोडून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
यामध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील ३५, आरोग्य ३५, बांधकाम १२, वित्त २१, सिंचन १० आणि कृषी विभागात ६ कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. यावर बनसोडे यांनी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तर आता पुन्हा असा प्रकार दिसल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची तंबी बनसोडे यांनी दिली.