औरंगाबाद - भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी काही ठिकाणच्या जागेवरुन दोन्ही पक्षात धुसफुस असल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्याचे शिवसेना आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढत घ्या, अशी मागणी केली आहे. त्यानंतर हीच मागणी आता औरंगाबादमध्येही होताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप यांनी युतीची घोषणा केली. या युतीने अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत. अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत घेण्याची मागणी होत आहे.
सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेतल्यास मैत्रपूर्ण लढत करू अशी मागणी भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी केली. युतीची घोषणा झाल्यावर खासदार चंद्रकांत खैरे यांना पाठिंबा देऊ, अशी भाजपची भूमिका होती. मात्र, चंद्रकांत खैरेंनी युती झाली नसती तरी विजयी झालो असतो असे वक्तव्य केले होते. खैरेंचे हे वक्तव्य भाजपच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी आपली भूमिका बदलली. शिवसेना तयार असेल आणि पक्षप्रमुखांची परवानगी असेल तर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे सेना - भाजपमध्ये शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.