औरंगाबाद - औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण दिवसंदिवस वाढत आहेत. कोरोनाबधितांची संख्या आता 17वर गेली असताना सारीपासून बचाव करण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.
सारी म्हणजे (सिव्हीअरली ऍक्युट रिस्पायरेटरी इलनेस) या रोगाने राज्यात शिरकाव करायला सुरुवात केली आहे. औरंगाबादेत आतापर्यंत सारीचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात मागील दहा दिवसांत दहा जणांचा मृत्यू सारीमुळे झाला आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात सिव्हीटीऐस विभागात सध्या सारीच्या 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सरीच्या दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सारीची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने भीती अधिक बळावली आहे.
श्वास घ्यायला त्रास, खूप ताप, सर्दी, खोकला, फुप्फुसात सूज येणे, कमी काळात प्रकृती अत्यावस्त होणे अशी कोरोनासारखी लक्षण असून वयोवृद्ध आणि रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या लोकांना याचा अधिक धोका आहे. औरंगाबादमधे वाढते रुग्ण पाहता घाटी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड तयार केला जात आहे. सिव्हीटीएसच्या इमारतीत उपचार केले जात आहेत. कोरोनाच्या वाढत्या धोक्यासोबत सारीचा धोका वाढल्याने प्रशासनापुढे संकट वाढल्याचं दिसून येत आहे.