औरंगाबाद - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत पतीला ओढल्याने तो बचावला. शहरातील बीड बायपास रस्त्यावरील एमआयटी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली.

स्नेहल मनोज बावळे वय २७ असे मृत महिलेचे नाव आहे. ती औरंगाबाद जिल्ह्यातील इटखेडा येथील रहिवासी आहे. स्नेहल पती मनोज बावळे यांच्यासोबत दुचाकीवरून किराणा सामान खरेदीसाठी शहरात आले होत्या. एमआयटीच्या सिग्नलवर येताच ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोघेही खाली पडले. स्नेहल यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पतीचा जीव वाचला. ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली असून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.