अमरावती - आज(18 ऑक्टेबर) दुपारी दीड वाजता मुसळधार पाऊस कोसळल्याने शहरातील पर्यटनाचे महत्त्वाचे स्थळ असणारा वडाळी तलाव ओवरफ्लो झाला आहे. सुमारे पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वडाळी तलाव ओव्हरफ्लो होण्याचा योग आला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून अपुऱ्या पावसामुळे वडाळी तलाव भरला नव्हता. तलाव भरला नसल्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात घाण कचरा आणि गाळ साचला होता. वडाळी तलाव यावर्षी पूर्णतः कोरडा झाला होता. तेव्हा महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून तलावात दोन दिवस सफाई अभियान राबवण्यात आले होते. मात्र हे अभियान फारसे परिणामकारक ठरले नाही. महापालिका प्रशासनाने संधी असूनही या तलावातून हवा तसा गाळ काढून सफाई केली नाही. यावर्षीही तलाव भरणार की नाही अशी शंका होती.
हेही वाचा - अमरावती : श्री समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गांधीजींना लिहले तेराशे फूट लांबीचे पत्र
ऑगस्टच्या अखेरीस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तलावाची पातळी बऱ्यापैकी वाढली होती. वडाळी तलावाच्या मागे जंगलात असणारा भवानी तलाव आणि फुटका तलाव तुडुंब भरल्यावर या तलावांतील पाणी वडाळी तलावात येते. आज मुसळधार पाऊस बरसताच तलावाचे पाणी भिंतीवरून ओसांडून वाहले.ल परिणामी वडाळी तलावापासून सुरू होणाऱ्या अंबा नाल्याला पूर आला होता. वडाळी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे आंबा नाल्यातील घाण, कचराही मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. तलाव तुडुंब भरला असल्याने तलावात नौकाविहार करण्यासाठी यंदा पर्यटकांची गर्दी निश्चितपणे उसळणार आहे.