अमरावती - श्री समर्थ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना तब्बल तेराशे फूट लांबीचे पत्र लिहिले आहे. महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. गांधीजींचे विचार, तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत या उद्देशाने लिहिलेल्या या पत्राचे विमोचन माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी करण्यात आले.
हेही वाचा - हाफ मॅरेथॉन स्पर्धेत धावले हजारो अमरावतीकर, केनियाचा रोनाल्डो किबीओटने मारली बाजी
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, तत्त्वज्ञान, त्यांनी दिलेला अहिंसेचा संदेश, त्यांची जीवन प्रणाली याबाबत अभ्यास करून समर्थ विद्यालयाच्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गांधीजीं बाबत आपले विचार पत्राच्या माध्यमातून व्यक्त केले. 'प्रिय बापूंनी आम्हाला काय दिले', असा पत्राचा विषय होता. शाळेच्या मुख्याध्यापिका माधवी मंगरूळकर यांनी शाळेतील मराठीच्या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गांधीजीं बाबत माहिती उपलब्ध करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके, इंटरनेट आदींद्वारे महात्मा गांधींबद्दल माहिती मिळवली. 'हे पत्र गांधीजींना पोहोचणार नाही ते खरे असले तरी गांधीजींचे विचार आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावे' हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे मुख्याध्यापिका माधवी मंगरूळकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना संगितले.