अमरावती - शुद्ध व थंड पाण्याच्या नावावर अनेकांनी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे शहरातही शासनाची विनापरवानगी आरओ प्लांट सुरू केले होते. हे पाणी मानवी आरोग्यास अपायकारक असून भूगर्भातील अमर्याद उपसा करून मिळविले आहे, असा दावा करत अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वेच्या नगरपरिषद क्षेत्रातील ६ पिण्याचे थंड पाणी कॅन प्लांट बंद करून सील करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश
राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना प्लांटच्या चौकशीचे आदेश निर्गमित केले होते. तसेच विनापरवानगी सुरू असलेले युनिट-प्लांट तात्काळ सील करण्याचे व कारवाईचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश आहेत. त्यानुसार स्थानिक नगरपरिषदेने कारवाई केली आहे.
हेही वाचा - सातारा : पत्नी नांदत नाही म्हणून नवर्याची गळफास घेऊन आत्महत्या
सहा आरो प्लांटवर कारवाई
चांदूर रेल्वे शहरातील साई ॲक्वा मातोश्री ॲक्वा,राज ॲक्वा, जलसागर ॲक्वा जैन ॲक्वा, अंबिका ॲक्वा असे सहा प्लांट सील केले आहेत. तर एका घरी प्लांट असून ते घर बंद असल्याने तेथे सील होणे बाकी आहे. त्यालाही लवकरच सिल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा - सिंदखेडराजा तालुक्यात पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक; २ पिस्तूल व मॅग्झिन जप्त