मुंबई - नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) च्या विरोधात देशभरात तीव्र विरोध होत असताना महाराष्ट्रातही याचा परिणाम बघायला मिळाला. राज्यातील विविध शहरांमधील मुस्लिम संघटना तसेच काही राजकीय पक्षांकडून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील गोंदिया, अमरावती, अहमदनगर, माढा, नंदुरबार अशा विविध शहरांमध्ये तीव्र विरोध करत लोक रस्त्यावर आले.
गोंदियात मुस्लिम समुदायाचा नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात मोर्चा-
नागरिकत्व संशोधन कायद्याविरूध्द आज गोंदिया शहरात संविधान मैत्री संघ यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांनी समर्थन दर्शवित या मोर्चात सहभाग दर्शविला. गोंदियाच्या आंबडेकर चौकातून ह्या मोर्चाला सुरूवात झाल्यावर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे पोहोचला. त्यानंतर संविधान मैत्री संघातर्फे विरोधाचे निवदेन देण्यात आहे.
अमरावतीत सुध्दा मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवत हिंदुस्थान जिंदाबादच्या दिल्या घोषणा-
नागरिकत्व कायद्याविरोधात आज मुस्लिम संघटनांनी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील दर्यापूर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंद दरम्यान मुस्लिम समाजबांधवांचा भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या मोर्चादरम्यान 'हिंदुस्थान जिंदाबाद' अशा घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. नागरिकत्व संशोधन कायदा त्वरित मागे घेण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन यावेळी तहसीलदारांना सादर करण्यात आले.
अहमदनगरमध्ये जमायते ऊलैमे हिंदसह विविध राजकीय पक्ष-संघटनांचा नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध मोर्चा-
जिल्ह्यातील जामखेड शहरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात येथील खर्डा चौकातून तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव, जमीयते ऊलैमे हिंद जामखेड व समविचारी संघटना तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला व धरणे आंदोलन करण्यात आले.
माढ्यातही निषेध मोर्चा-
केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व संशोधन कायद्याच्या निषेधार्थ माढा शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी एकत्रित येऊन निषेध करत नागरिकत्व संशोधन कायदा त्वरित रद्द करण्याच्या निवेदनाबरोबरच निषेधाचे पत्र माढा तहसील व माढा पोलीस प्रशासनास दिले.
नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ हा फक्त मुस्लिम समाजाचे नागरिकत्व नाकारण्यासाठी एनआरसी कायदा मंजूर झाला आहे, अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या.
नंदुरबार आणि शहाद्यातही सामाजिक संघटनांकडून मोर्चा-
जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार शहरात नागरिकत्व सुधारणा कायदाच्या विरोधात अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले. दुपारच्या नमाजनंतर सर्वच प्रमुख मुस्लिम संघटनांनी एकत्र येत या कायद्याला विरोध केला आहे. त्याचप्रमाणे शहादा येथेही मोर्चा काढण्यात आला. सर्वत्र हिंसक आंदोलन होत असताना नंदुरबार जिल्ह्यात शांततेत आंदोलन करण्यात आले.