अमरावती - कोरानाचे थैमान नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून युध्दस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अमरवतीमधील नागरिकांची मनमानी वर्तणूक त्यात अडसर ठरत आहे. विनाकारण रस्त्यावर जमावाने फिरणाऱ्यांचे प्रमाण कायम राहिल्याने करोनाबाधिताचा आकडा वाढत आहे. विनाकरण रस्त्यावर फिरणारे, बाहेर बसणाऱ्यांवर प्रशासन ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवत आहेत. मात्र, लोक तरीही घराबाहेर फिरतच आहेत, तर ड्रोनची नजर पडताच घरात पळून जाताना दिसत आहेत.
चांदूर रेल्वे शहरातील काही अडगळीच्या, नजरेत नसलेल्या रस्त्यांवर लोक मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे गप्पांच्या निमित्ताने एकत्र येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चांदूर रेल्वेचे ठाणेदार दिपक वानखडे यांनी थेट ड्रोन कॅमेराव्दारे शहरातील प्रत्येक नगराची पाहणी केली. त्यावेळी लोक बाहेर फिरताना आढळून आले. तर ड्रोन कॅमेऱ्याची नजर पडताच घरात पळून जात असल्याचे समोर आले.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 60 च्या वर गेला आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे शहरातसुध्दा काही प्रमाणात नागरिकांत भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन जीव ओतून काम करत आहे. मात्र, वारंवार सांगूनही लोक घराबाहेर पडतच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवून कारवाई करण्यात येणार आहे, ठाणेदार दिपक वानखडे यांनी दिले आहे.