Intro:भाजपमधल्या सगळ्या 'आऊटसोर्स ताई-माई-अक्का आज गायब असतील;उत्तरप्रदेश प्रकरणावरून मंत्री यशोमती ठाकूर कडाडल्या....
अमरावती - सध्या उत्तरप्रदेश मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुकी दरम्यान समाजवादी पक्षाच्या नेत्या रितू सिंह या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी गेल्या असता, तेथील एका भाजप कार्यकर्त्याने त्यांच्यासोबत गैरवर्तणूक केल्याचा आरोप होत आहे. सोबतच त्या कार्यकर्त्यांने हल्ला केल्याच समाजवादी पक्षाच्या नेत्या रितू सिह यांचे म्हणणे आहे. भाजपचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेश मध्ये एका महिला नेत्याशी झालेल्या गैरवर्तनिकीवर महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणानंतर मंत्री ठाकूर यांनी ट्विट करत राज्यातील भाजप नेत्या चित्रा वाघ व इतर महिला नेत्यांवर नाव न घेता बोचरी टीका केली आहे. भाजप मधल्या सगळ्या आऊटसोर्स ताई-माई अक्का' आज गायब असतील अशा आशयाच ट्विट मंत्री यशोमती ठाकूर यांनी करत जोरदार निशाणा साधला आहे.
काय आहे प्रकरण..
उत्तरप्रदेश मधील स्थानिक निवडणुकीत नामनिर्देशित अर्ज भरण्यासाठी जाणाऱ्या समाजवादी पक्षाच्या महिला नेत्याशी एका व्यक्तीने गैरवर्तवणूक केली. ही घटना लखीमपूर खेरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थानिक भागातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्कल अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. महिलेशी गैरवर्तवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अपक्ष आमदाराचा समर्थक असल्याचे बोलले जात आहेत. या प्रकरणात स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.
भाजप कार्यकर्त्याने गैरवर्तवणूक केल्याचा आरोप
गैरवर्तवणुकीच्या प्रसंगाला सामोरे गेलेल्या समाजवादी पक्षाच्या नेत्या रितू सिंह म्हणाल्या, की भाजप कार्यकर्त्याने नामनिर्देशित अर्ज भरण्यापासून रोखले होते. तसेच त्याने त्यांच्यावर हल्लाही केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते क्रांती कुमार सिंह म्हणाले, की ज्या वेळी घटना घडत होती, त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, खासदार रेखा वर्मा आणि भाजपचे आमदार लोकेंद्र प्रतास सिंह हेदेखील उपस्थित होते. ही घटना भाजपमुळेच घडल्याचा त्यांनी दावा केला. महिला नेत्याशी गैरवर्तवणूक केल्याचा व्हिडिओ हा समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. या घटनेवरून समाजवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.